श्रीरामपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी :– पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे स्पष्ट निर्देश
श्रीरामपूर / शिर्डी :- श्रीरामपूर शहरासाठी मंजूर करण्यात आलेल्या १७८ कोटी रुपयांच्या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती देत ती ठरलेल्या कालमर्यादेत दर्जासहित पूर्ण करावी, असे स्पष्ट निर्देश जलसंपदामंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहेत.
श्रीरामपूर शहरातील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण समारंभ पालकमंत्री विखे-पाटील यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठकीद्वारे आणि प्रत्यक्ष स्थळ पाहणीद्वारे पाणी पुरवठा योजनेच्या प्रगतीचा आढावा घेतला.
वाढत्या लोकसंख्येचा विचार
२०५१ पर्यंत वाढणाऱ्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन या योजनेची आखणी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत २६.३६ दशलक्ष लिटर प्रतिदिन (MLD) पाणीपुरवठ्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे. सद्यस्थितीत जलशुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून, दगडी सोलिंग व क्रॉकींगचे काम वेगाने सुरू आहे.
पाइपलाइन आणि तलाव विकासकामांची माहिती
या योजनेतून शहरभर पाणी वितरणासाठी एकूण ५९ कि.मी. लांबीची पाइपलाइन टाकण्यात येणार असून, त्यापैकी १७ कि.मी. पाइपलाइनचे काम पूर्ण झाले आहे. पाणीसाठवण तलावाच्या संदर्भात सर्वेक्षण आणि बोअर कोअर चाचण्या पूर्ण झाल्या असून लवकरच खोलीकरणाचे काम सुरू होणार आहे.
तलावातील आरसीसी काम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या तळाचा थर प्लास्टिक शीट व वाळूने मजबूत करण्यात येणार आहे. हे काम सुमारे दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
जबाबदारीने काम करण्याचे आवाहन
शहराच्या भविष्यातील वाढत्या नागरी गरजा लक्षात घेता ही योजना अत्यंत महत्वाची आहे. त्यामुळे कामे वेळेत, दर्जासह आणि सामाजिक भावना लक्षात घेऊन पार पाडावीत, असे आवाहनही पालकमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना केले.
या कार्यक्रमास प्रांताधिकारी किरण सावंत-पाटील, मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप, तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहरातील जलसंपदाविषयक संरचना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने ही योजना मैलाचा दगड ठरणार आहे. शासनाच्या निधीचा योग्य वापर करून नागरिकांना उत्तम पाणीपुरवठा सुविधा देणे, हीच खरी लोकसेवा असल्याचे प्रतिपादनही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यावेळी केले.