नवनियुक्त तालुकाध्यक्ष विकास कळमकर यांचा निर्धार; तरुणांची भरघोस साथ मिळत इतर पक्षांना मिळणार आव्हान
पारनेर :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असतानाच पारनेर तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर जनता दल (सेक्युलर) या राष्ट्रीय स्तरावरच्या पक्षाने तालुक्यात आपला ठसा उमटवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे. नुकतेच तालुकाध्यक्षपदी नियुक्त झालेल्या विकास कळमकर यांनी स्पष्ट शब्दांत घोषणा करत सांगितले की, “जनता दल (सेक्युलर) पक्ष पारनेर तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढवणार आहे.”
विकास कळमकर यांच्या नेतृत्वाखाली पक्ष विस्तार आणि नव्या नेतृत्वाची घडामोड
विकास कळमकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात पक्षबांधणीस सुरुवात झाली असून, अल्प काळातच शेकडो तरुणांनी पक्षात प्रवेश केला आहे. कळमकर यांनी या कार्यकर्त्यांना पक्षाच्या विविध पदांची जबाबदारी देण्याचे नियोजन आखले असून, गावपातळीवर पक्षाच्या शाखा स्थापन करून तळागाळातील लोकांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.
जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका..!
“शेतकरी, कामगार, युवक, महिला, विद्यार्थी, अपंग – या सर्व घटकांचे प्रश्न सातत्याने गंभीरतेने मांडणे आणि संघर्ष करून तोडगा काढणे, हेच आमचे ध्येय आहे,” असे सांगत कळमकर यांनी पारदर्शक व संघर्षशील राजकारणाची हमी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, “तालुक्यातील प्रत्येक गावाची समस्या आम्ही समजून घेणार असून, त्या प्रश्नांना शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलनाचीही तयारी आहे.”
इतर पक्षांना होणार फटका?
पारनेरच्या राजकीय पटलावर अनेक वर्षे पारंपरिक पक्षांचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. मात्र जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या या आक्रमक पावलांमुळे आता राजकीय समीकरणे ढवळून निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः युवा वर्गाचा ओघ आणि कळमकर यांचे सामाजिक क्षेत्रातील सक्रिय योगदान लक्षात घेता, इतर पक्षांना मोठे आव्हान उभे राहण्याची चिन्हं आहेत.
स्वराज्य संस्थांमध्ये नवा राजकीय पर्याय
पारनेर तालुक्यातील जनता पारंपरिक राजकीय पर्यायांमुळे त्रासलेली असून, बदलाची गरज वेळोवेळी अधोरेखित करत आली आहे. अशावेळी जनता दल (सेक्युलर) पक्षाने दिलेला स्वबळावर निवडणुका लढविण्याचा इशारा तालुक्यात राजकीय भूकंप घडवू शकतो.
या नव्या पक्षाची मांडणी, जनसंपर्क, आणि ठाम भूमिका पाहता येणाऱ्या काळात पारनेरमध्ये एक वेगळीच राजकीय लढाई रंगण्याची शक्यता आहे.